•      
  • English
  •      
  • मराठी


    महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण व संशोधन संस्था, नाशिक (मित्रा)

    राष्ट्रीय स्तरावरील मुख्य संसाधन केंद्र

    महाराष्ट्र शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत कार्यरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधिकरणाकडे राज्यातील पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनांच्या नियोजन व अंमलबजावणीची जबाबदारी देण्यात आलेली आहे. जागतिक बँक अर्थसहाय्य अंतर्गत उपलब्ध निधीतून सन 1984 पासून नाशिक संशोधन व प्रशिक्षण केंद्राची निर्मीती करण्यात आली. प्रशिक्षण केंद्र निर्मीतीमागे प्रमुख उद्देश हा महाराष्ट्र पाणी पुरवठा व मलनिस्सारण योजनेतील अभियंते, पर्यवेक्षक तसेच क्षेत्रीय चालकवर्ग यांना योजनांचे व्यवस्थापन व देखभाल व दुरुस्तीबाबत प्रशिक्षण देणे असा होता. सन 1985 पासून प्रत्यक्ष प्रशिक्षणाच्या कामास सुरुवात करण्यात आली. प्रथमत: तांत्रिक विषयांवर प्रशिक्षणाचा भर होता. त्यानंतर हळुहळु 1990 च्या काळात संस्था मान्यताप्राप्त झाली. राज्यामधील ग्रामपंचायत, नगरपंचायती, नगरपालिका, जिल्हा परिषदा व महाराष्ट्र शासनाचे इतर विभाग या संशोधन केंद्रातील प्रशिक्षणांचा लाभ घेत होते. हळुहळु पण एका ध्येयाने प्रशिक्षण केंद्राचा विकास होत गेला आणि आज पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील एक अग्रगण्य प्रशिक्षण केंद्र म्हणून संस्था राष्ट्रीय स्तरावर नावारूपास आलेली आहे.

    संस्थेची मित्रा म्हणून वाटचाल

    सन 2011 मध्ये राज्य शासनाने राज्यात शासकीय संस्थांमध्ये कार्यरत असलेल्या सर्व अधिकारी / कर्मचारी यांच्या विकासाच्या दृष्टीने आणि त्याजोगे सर्वसामान्य जनतेला शासकीय योजनांचा लाभ योग्यरित्या मिळावा म्हणुन राज्य प्रशिक्षण धोरण अंमलात आणले. सदर धोरणांतर्गत राज्य शासकीय सेवकांच्या कार्यक्षमतेत प्रशिक्षणाद्वारे वाढ व्हावी व ते सक्षमपणे उद्भवणाज्या आर्थिक, सामाजिक, राजकीय व तांत्रिक बदलास सामोरे जावे, यासाठी हे धोरण अंमलात आणले. प्रशिक्षण धोरणांतर्गत शासनाच्या प्रत्येक विभागाचे स्वत:चे राज्य प्रशिक्षण केंद्र असावे असे निर्देश शासनाने दिले.

    नाशिक संशोधन व प्रशिक्षण केंद्र हे पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रात विविध विषयांचे प्रशिक्षण सन 1985 पासुन आयोजीत करीत आहे. त्यामुळे शासनाच्या पाणी पुरवठा व स्वच्छता विभागांतर्गत राज्यस्तरीय प्रशिक्षण केंद्र म्हणुन महाराष्ट्र शासन पाणी पुरवठा व स्वच्छता विभाग शासननिर्णय दि. 10/05/2012 अन्वये घोषित करण्यात आले. सदर केंद्राची व्याप्ती ही वाढविण्याच्या दृष्टीने केंद्राचे नामकरण "महाराष्ट्र पर्यावरण अभियांत्रिकी प्रशिक्षण आणि संशोधन संस्था (मित्रा)" असे करण्यात आले. मित्रा संस्थेस स्वायत्त दर्जा बहाल करण्यात आला व यशदाच्या धर्तीवर नियामक मंडळ, कार्यकारी समिती व मित्रा व्यवस्थापन अशी त्रिस्तरीय रचना करण्यात आली. मित्रा संस्था प्रशिक्षणाच्या दृष्टीने "उत्कृष्टता केंद्र" म्हणुन उदयास यावे व पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रासाठी मुख्य संसाधन केंद्र म्हणुन कार्यरत व्हावे याकरिता जलस्वराज्य टप्पा-2 कार्यक्रमांतर्गत मित्राच्या विकासाचा प्रकल्प अहवाल तयार करण्यात आला.

    मित्रा - राष्ट्रीय संसाधन केंद्र

    केंद्र शासनाच्या जलशक्ती मंत्रालयामार्फत देशातील जनतेचे जीवनमान सहज व्हावे, त्यांच्या आरोग्यात सुधारणा व्हावी आणि ग्रामीण भागातील लोकांमधील विशेषत: महिला व बालके यांचे सामाजिक, आर्थिक जीवनस्तरात वाढ व्हावी, योग्य गुणवत्ता व नियमीत पिण्याची पाण्याची शाश्‍वतता यादृष्टीने राष्ट्रीय जलजीवन मिशन कार्यक्रम राबविण्यात येत आहे. या मिशन अंतर्गत सन 2024 पर्यंत प्रत्येक घराघरात कार्यरत घरगुती नळजोडणी द्वारे पाणी पुरविण्याचे ध्येय ठरविण्यात आले आहे. या अंतर्गत मित्रा संस्थेला राष्ट्रीय स्तरावरील 'मुख्य संसाधन केंद्र' (Key Resource Centre) म्हणुन केंद्रशासनाच्या जलशक्ती विभागाच्या दि. 09/04/2021 च्या पत्रान्वये नियुक्त करण्यात आले आहे.

    Key Resource Centre म्हणून नियुक्ती मिळाल्यानंतर मित्रामार्फत महाराष्ट्र, मध्यप्रदेश, छत्तीसगड व झारखंड या चार राज्यांसाठी विविध विषयांचे प्रशिक्षण Middle Level Management Level 2 साठी ऑनलाईन पध्द्तीने घेण्याचे प्रस्तावित केले आहे. सदर प्रशिक्षण कार्यक्रम माहे ऑक्टोबर 2021 ते डिसेंबर 2021 या कालावधीत पुर्ण करण्याचे नियोजन आहे. तसेच राज्य जलजिवन मिशन साठी मित्रामार्फत महाराष्ट्रातील पाणी पुरवठा क्षेत्रात कार्यरत असलेल्या महाराष्ट्र जीवन प्राधीकरण व जिल्हा परिषदांमधील सर्व स्तरांवरील अभियंत्यांसाठी मिशन अंतर्गत योजना तयार करण्याचे दृष्टीने मार्गदर्शक प्रशिक्षण कार्यक्रम घेण्यात येत आहेत.

    पाणी पुरवठा व स्वच्छता क्षेत्रातील राज्य, राष्ट्रीय तसेच जागतिक स्तरावरील प्रशिक्षण संस्था म्हणून या संस्थेचा नावलौकिक व्हावा यास्तव त्या दर्जाच्या सोयीसुविधा येथे निर्माण करण्यात आल्या असून प्रशिक्षणाचा दर्जा वाढविण्याबाबतही प्रयत सुरु आहेत.

    सामाजिक, आर्थिक दृष्टीकोन स्वीकारुन पाणी, स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रासाठीची मुख्य संसाधन संस्था म्हणुन मित्राची वाटचाल सुरु करण्यात आलेली आहे. सध्या मित्रा संस्था राष्ट्रीय स्तरावर जलजीवन मिशनच्या माध्यमातून मुख्य संसाधन केंद्र म्हणून नियुक्त झाली आहे. पुढील काळात मित्रा संस्था राष्ट्रीय स्तराबरोबरच आंतरराष्ट्रीय स्तरावरही पाणी, स्वच्छता व पर्यावरण क्षेत्रासाठी 'उत्कृष्टता केंद्र' म्हणुन गणली जावी यासाठी प्रयत्नशील आहे.

    महत्वाच्या लिंक्स